उंडाळे : पुढारी वृत्तसेवा : 'अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे'असे म्हटले आहे. याच म्हणीप्रमाणे संपूर्ण गावाला उत्तमोत्तम पदार्थांचा महाप्रसाद देण्याची परंपरा सवादे ता. कराड गावात जपली जात आहे. हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त देण्यात येणार्या महाप्रसादासाठी 2040 – 41 वर्षांपर्यंत अन्नदान करणारे अन्नदाते मिळाले आहेत. पुढील 20 वर्षांच्या अन्नदान देणार्या दानशुरांनी आत्ताच बुकिंग करून ठेवले असून, या गावातील दानशूर व्यक्तींचे भागात कौतुक होत आहे.
कराड दक्षिण च्या डोंगरी भागातील सवादे हे आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे गाव आहे, येथील बहुतांश लोक मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. याच मुंबईस्थित ग्रामस्थांनी येथे हनुमानाचे भव्य व देखणे वास्तुशिल्पाचा उत्तम उदाहरण असणारे हनुमान मंदिर बांधले आहे. या हनुमान मंदिराच्या उद्घाटनानंतर या गावात गेल्या 16 वर्षांपासून हनुमान देवाची भव्य यात्रा भरवली जाते. या मंदिराच्या बांधकामानंतर या गावात ग्रामस्थांनी शाकाहारी यात्रा सुरू केली.
या शाकाहारी यात्रेनिमित्त हनुमान जयंती नंतर येथे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याच कार्यक्रमात मधील एक भाग म्हणजे शाकाहारी यात्रा. सर्व धार्मिक कार्यक्रम व विधी झाल्यानंतर संपूर्ण गाव व विभागातील लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते .
प्रारंभी ग्रामस्थांनी पहिली एक, दोन वर्षे स्थानिक लोकवर्गणी द्वारे महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण केला. पण, त्यानंतर या गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणी पेक्षा आम्ही स्वतः हा महाप्रसाद देऊ शकतो, असे यात्रा कमिटीला सांगितले. त्यामुळे लोकवर्गणीतून जमा होणारे पैसे इतर सार्वजनिक व सामाजिक कामासाठी वापरले जाऊ लागले व महाप्रसादाचा खर्च एकटीच व्यक्ती करू लागली. या महाप्रसादासाठी उत्तम पद्धतीचे जेवण दिले जाते. या महाप्रसादाचा किमान पाच ते सहा हजार भाविक लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यासाठी किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो.
त्यामुळे सध्या महाप्रसादाचा भार उचलण्याचे काम 2040 – 41 वर्षांपर्यंत दानशूर भाविकांनी उचलले असून, भविष्यकाळात ही अनेकांनी आपण महाप्रसाद देऊ, असे यात्रा कमिटी व ग्रामस्थांना सांगितले आहे. त्यामुळे सवादेच्या दानशूरपणाचे विभागात कौतुक होत आहे.