

कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आला आहे. पूर्वी नियंत्रित पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या ‘चंदा’ या वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरीत्या मुक्त करण्यासाठी दरवाजे खुले करण्यात आले होते. गेले दोन दिवस ही वाघीण त्याच एन्क्लोजरमध्ये फिरत होती. आतमध्ये शिकार करून दोन दिवस ती तेथेच राहिली. दरवाजा उघडा असूनही ती बाहेर आली नाही. मात्र, गुरुवारी (दि. 20) सकाळी 8 वाजता डौलदारपणे एन्क्लोजरमधून बाहेर पडत तिने जंगलात झेप घेतली.
पश्चिम घाटात वाघांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन तारा’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून ताडोबा येथून 850 किलोमीटरवरून ‘चंदा’ या वाघिणीला चांदोली येथे आणले होते. येथे आल्यावर या वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व सवय प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले.
वैज्ञानिक मॉनिटरिंग आणि पश्चात निरीक्षण यासाठी वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आली असून, तिचे उपगृह टेलिमेट्री व ‘व्हीएचएफ’ अँटेना ट्रॅकिंगच्या माध्यमातून 24 तास पर्यवेक्षण केले जाणार आहे. या कामासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि भारतीय वन्यजीव यांचे प्रशिक्षित पथक नियुक्त करण्यात आले आहे.
या मोहिमेमध्ये क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, वनक्षेत्रपाल ऋषीकेश पाटील (चांदोली), अर्शद मुलानी (हेळवाक), अक्षय साळुंखे (कोयना), तुषार जानकर (पाटण), किरण माने (ढेबेवाडी), प्रदीप कोकीटकर (आंबा) व वनपाल वनरक्षक सहभागी होते.
वाघीण एन्क्लोजरमधून 40 तासांनी बाहेर
राज्य शासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान व ‘डब्ल्यूआयआय’ यांच्या एकत्रित सहकार्याने व्याघ्र पुनर्वसन व संवर्धनाची दिशा अधिक भक्कम होत राहील. पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दरवाजे उघडल्यानंतर 40 तासांनी ‘चंदा’ वाघीण एन्क्लोजरमधून बाहेर पडणे हा व्याघ्र प्रकल्पासाठी एक मोठा टप्पा असून, यासाठी प्रयत्न करणारी सर्व टीम व या मैलाच्या दगडाची पायाभरणी केल्याबद्दल डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.