

सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक रोखण्यासाठी विरोधी गटाने केलेले सर्व प्रयत्न पूर्णतः अयशस्वी ठरले आहेत. परिषदेचे सभासद नसलेल्या राजकुमार भानुदास धुरगुडे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका निवडणुका थांबवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मसापच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मसापबाबत विरोधकांनी नेहमीच दुहेरी भूमिका घेतली. परिषदेची निवडणूक जिंकता येत नाही हे लक्षात आल्याने प्रशासक आणून परिषदेचा ताबा मिळवायचा परंतु विरोधकांचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उधळला गेला आहे.
सर्वोच्च न्यायलयाच्या निकालामुळे निवडणुका स्वच्छ, पारदर्शक आणि नियमानुसार होत असून ही निवडणूक वैध आणि कायदेशीर मार्गाने होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जनतेच्या आणि सभासदांच्या मनात गैरसमज पसरवण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे चपराक बसली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे त्यांचे पितळ उघडे पडले असून मतपेटीतूनही सभासद याबाबत निर्णायक कौल देतील. सभासद टीका करणाऱ्यांपेक्षा काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात परिषदेचे वकील ॲड. यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. सागर पाहुणे पाटील यांनी युक्तिवाद केला.