

सातारा : सातारा जिल्ह्याचा विकास हा माझ्यासाठी केवळ राजकीय मुद्दा नाही, तर माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. राज्यसभेचा खासदार असताना आणि त्यानंतर लोकसभेवर लोकनियुक्त खासदार म्हणून मी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे सातारा जिल्ह्यातील विकासकामांचा पाठपुरावा केला आहे. जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सिंचन, पर्यटन आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला जात आहे. ही प्रक्रिया आणखी वेगवान करायची आहे. त्यामुळे विकास, स्थैर्य आणि विश्वासासाठी भाजपलाच साथ द्या, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या प्रचारादरम्यान बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने सातारा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज जिल्ह्यातील गावागावांत विकासाची गंगा पोहोचलेली दिसते आहे. अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लागली, नवीन प्रकल्प मंजूर झाले आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असलेल्या मूलभूत सुविधांना गती मिळाली. हे सर्व शक्य झाले ते केवळ भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले, भाजप हा केवळ निवडणुकीपुरता दिसणारा पक्ष नाही, तर काम करणारा, उत्तरदायित्व स्वीकारणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या कणा आहेत. या संस्थांच्या माध्यमातून गावागावांतील रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, शाळा, अंगणवाडी, स्वच्छता आणि शेतीपूरक सुविधा मजबूत करता येतात. ही कामे वेगाने आणि पारदर्शकपणे करायची असतील तर या ठिकाणी भाजपचे सक्षम आणि विकासाभिमुख प्रतिनिधी निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे.
काही लोक फक्त टीका करण्यात आणि भ्रम निर्माण करण्यात वेळ घालवतात. पण सातारा जिल्ह्याची जनता आता सजग झाली आहे. तिला घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष काम हवे आहे. भाजपाने गेल्या काही वर्षांत जे काम करून दाखवले आहे, त्याची पोचपावती जनतेने विविध निवडणुकांत दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकालही याच विश्वासाचे प्रतीक आहेत. आज ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपच्या माध्यमातून होत आहे. म्हणूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही विकास, स्थैर्य आणि विश्वासासाठी भाजपलाच मतदान करणे ही काळाची गरज आहे, असेही खा. उदयनराजे म्हणाले.