

सातारा : सध्याची शिक्षण घेणारी पिढी ही देशाचे केवळ भविष्य नसून देशाचे वर्तमान आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेले एज्युदिशा प्रदर्शन हा एक प्रकारचा ज्ञानयज्ञ असून, या माध्यमातून विद्यार्थी अधिक सक्षम बनून ते देशाला अधिक सामर्थ्यशाली करतील. ‘पुढारी’च्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आतल्या अग्नीचा अग्नीकुंड धगधगता ठेवावा, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख निखिल पिंगळे यांनी केले.
दै. ‘पुढारी’च्या वतीने येथील अलंकार हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'एज्युदिशा करिअर' प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीश पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीचे प्रा. जयेश बलदोटा, एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे नीरव शिंदे, चाटे शिक्षण समूहाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र घुले, दै. ‘पुढारी’चे इव्हेंट हेड राहुल शिंगणापूरकर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा पोलिस प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्तविक हरीश पाटणे यांनी केले. उद्धव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपा कुलकर्णी यांनी केले.