

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील सौंदरी गावात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून काही घरांची छपरे उडाली तर काही ठिकाणी भिंती कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौंदरी गावात वादळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून कलमी आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक आंब्याची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. तसेच भाजीपाला शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.परिसरातील अनेक मोठी झाडे उन्मळून वीजवाहिन्यांवर कोसळली. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
झाडे वीज वाहिन्यावर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. सौंदरी येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. तातडीने पंचनामा करून मदत पोहोचवावी.