

सिंधुदुर्ग : गेले आठ ते दहा दिवस जिल्ह्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. रविवारी दिवसभरात अधूनमधून मुसळधार सरी कोसळल्या. यामुळे रखडलेल्या भात लावणी कामाला पुन्हा वेग आला आहे. सरीने कोसळणाऱ्या पावसामुळे नदीनाल्यांच्या पातळीतही वाढ झाली असून, काही नद्यांना पूर आल्याचे चित्र दिसून आले. पावसाचा विशेषत: सह्याद्री पट्ट्यात चांगला जोर होता. दोन सरी दरम्यान मोठा खंड पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले नाही. या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
पाऊस नसल्याने भात लावणीचे काम रखडले होते. तर लावणी केलेली भातरोपे वाळू लागली होती. आता दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीला संजीवनी मिळाली आहे. लावणीच्या कामालाही वेग आला असून, पाऊस असाच समाधानकारक राहिल्यास चालू आठवड्यात भात लावणीची बहुतांश कामे आटोपतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. भात लावणीबरोबरच नाचणी, वरी, भुईमूग आदी पेरणी व लावणीलाही सुरुवात झाली आहे. पाऊस सुरू झाला असला तरी हवेतील दमटपणा कायम असल्याने वातावरणातील गरमी मात्र कायम आहे.