कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहेे. यामुळे कोरेगाव व कराड उत्तर मतदारसंघातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांची रास लागली आहे. हे खड्डे चुकवताना नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. मात्र, पुन्हा खडी उखडल्यानंतर खड्डे जैसे थे होत आहेत. हे खड्डे मुजवण्यासाठी बांधकाम विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
पुणे, सासवड, निरा, लोणंदमार्गे कोरेगावहून कराडला जाणारी वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने या भागात जाणार्या प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालकांचे नुकसान होत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच खड्डयातील साचलेले पाणी अंगावर उडल्याने वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. यासाठी दोन्ही मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.