सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीच्या ज्या सदस्यांनी पक्षादेश पाळला नाही, त्यांच्याविरोधात पक्षाने सदस्यत्व रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली आहे. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते उदय कबुले यांच्या वतीने ही याचिका दाखल केली असून कामेश कांबळे, ऋतुजा जगताप व लता कर्णे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे ही याचिका दाखल केाली. यावेळी उदय कबुले, वकील ॲड. दत्तात्रय घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. घोडके माध्यमांशी बोलताना म्हणाले, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्हीप काढला होता. हा पक्षादेश ऋतुजा जगताप, लता कर्णे आणि कामेश कांबळे यांनी पाळला नाही. त्यांनी विरोधकांना मदत केली. त्यामुळे गटनेते उदय कबुले यांच्या वतीने या तीन सदस्यांविरोधात महाराष्ट्र लोकल मेंबर्स डिस्कॉलिफिकेशन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्यत्व रद्दबातलची याचिका दाखल केली.
जिल्हाधिकारी या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून या सदस्यांना नोटिसा काढतील. जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणात काय कार्यवाही करावी, याबाबत योग्य ती नियमावली आहे. या कारवाईसाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्याआधी याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय देतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील केले जाऊ शकते. त्यांच्या निर्णयानंतर अंतिम याचिका ही उच्च न्यायालयात दाखल केली जाईल, असेही ॲड. घोडके यांनी सांगितले.