

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रंणागण चांगले तापले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी अनेक तालुक्यांमध्ये झुंबड उडाली. झेडपी गटासाठी जिल्ह्यात 129 तर पंचायत समिती गणासाठी 168 जणांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे.
आत्तापर्यंत 3543 अर्ज इच्छुकांनी घेतले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही ठाम भूमिका न घेतल्यामुळे ए.बी. फॉर्म वाटप रखडले आहे. उद्या बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात या फॉर्मचे वाटप होणार आहे. असे असले तरी अनेक इच्छुकांनी त्याची फिकीर न करता मंगळवारी रणांगणात उडी घेतली. कागदपत्रांची पूर्तता करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता मागे हटायचे नाही, असा इरादा व्यक्त केला.
साताऱ्यात गटासाठी 25 तर गणासाठी 29 अर्ज
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी साताऱ्यातील 8 जि.प. गटासाठी 25 अर्ज तर 16 पंचायत समिती गणासाठी 29 अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत 469 इच्छूकांनी प्रशासनाकडून अर्ज घेतले आहेत.
सातारा तालुक्यात मंगळवारी नागठाणे गटातून व गणातून अजय ढाणे, लक्ष्मण ढाणे, नागठाणे गणातून शिवाजी डांगे, खेड गणातून किशोर सपकाळ, भाग्यश्री माने, अमित निकम, उमेश नावडकर, खेड गटातून दिलीप कांबळे, कांतीलाल कांबळे, दिपक शिंदे, खेड गणातून पूजा गायकवाड, कारी गटातून सचिन मोहिते, कारी गणातून छाया मोरे, सुनंदा महामूलकर, परळी गणातून सागर रायते, पाटखळ गटातून गौरी नलवडे, संजना साबळे, पाटखळ गणातून पल्लवी साबळे, हणमंत सोनटक्के, अतित गणातून सविता जाधव, कोडोली गटातून स्नेहल माने, कोडोली गणातून रामदास साळुंखे, दिलीप जाधव, प्रल्हाद जाधव, लिंब गटातून सचिन पाटील, जितेंद्र सावंत, लिंब गणातून जितेंद्र सावंत, वर्णे गटातून वैभव चव्हाण, वर्णे गणातून माधवी काळंगे, साक्षी माने, शेंंद्रे गणातून पाकीजा मुलाणी, पूजा मोरे, क्षेत्रमाहूली गणातून रूपाली शिंदे, शिवथर गणातून किशोर शिंदे, संभाजीनगर गणातून मनिषा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
मंगळवारी गटासाठी 17 तर गणासाठी 28 अर्ज दाखल झाले. आजअखेर गटासाठी 25 तर गणासाठी 29 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आतापर्यंत 469 इच्छूकांनी प्रशासनाकडून अर्ज घेतले आहेत. दरम्यान, बुधवार दि. 21 जानेवारी रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे. महाविकास आघाडी व महायूतीच्या घटक पक्षांनी अद्यापही उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली नाही. त्यामुळे सर्वच इच्छुक गॅसवर राहिले आहेत. तरीही काहींनी पक्षाची नावे घेवून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांना पक्ष एबी फॉर्म देणार का? याबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे.