

सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये सातारा परिषद राज्यात कायम पुढे ठेवणार असल्याची ग्वाही सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या घरकुलांना सोलर सिस्टिम देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे बजेट सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना याशनी नागराजन म्हणाल्या, सातारा जिल्ह्यातील कोणत्याही महिलेला कर्करोगाच्या निदानासाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागू नये तसेच त्यांना वेळेत उपचार मिळावेत या हेतूने आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात मिशन तेजस्विनी हा प्रकल्प राबवण्यात आला तो राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. हाच उपक्रम राज्य शासनामार्फत राबवला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या सादर केलेल्या अंदाजपत्रकात प्रत्येक विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमावर भर देण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे 100 व दुसऱ्या टप्प्यात सुमारे 50 अंगणवाड्या अशा मिळून 150 अंगणवाड्या मॉडेल अंगणवाड्या झाल्या आहेत. अंगणवाड्यांची पहिली स्थिती व आताच्या अंगणवाड्यांमध्ये फार बदल करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा परिषदेला राज्य शासनाच्या विविध योजनांमधून आलेला निधी, जिल्हा वार्षिक निधी, नियोजन समिती यासह विविध योजनांवर आतापर्यंत सुमारे 95 टक्के निधी खर्च झाला आहे. शासनाचा निधी सर्व खर्च होणार असून तो निधी माघारी जाणार नाही याची सर्व विभागात दक्षता घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला निधीची तरतूद केली आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना भेटी देवून तेथील समस्या ऐकून घेवून विकास कामे करण्यावर भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.