

सणबूर : एकूणच राज्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीला अखेर वादाचे गालबोट लागले आहे. या निवडणुकीदरम्यान भाजपाकडून जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा वापर करून दडपशाही करण्यात आल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी न झुकता ठामपणे उभे राहत लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संख्याबळाच्या गणितानुसार भाजपाचा विजय कठीण असल्याचे स्पष्ट होताच, सत्ता टिकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा अवलंब करण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी करण्यासाठी विविध डावपेच रचले गेल्याचेही दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावून राज्याचे पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री आणि सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकाच वेळी दहा पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न होऊनही देसाई यांनी माघार न घेता घटनास्थळी ठामपणे उभे राहत संघर्षाची भूमिका कायम ठेवली.
दरम्यान, दोन सदस्यांवर कथित खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मतदानासाठी जात असताना अटक करण्यात आली. त्यामुळे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गोंधळात मंत्री देसाई यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. मात्र, हाताला रुमाल बांधून त्यांनी मैदान सोडले नाही. जखमी अवस्थेतही त्यांनी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेविरुद्ध ठामपणे उभे राहत लोकशाहीचा गळा घोटू देणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला. सत्तेचा ताबा गेला असला तरी, शिवसेनेचा मावळा भिडला, लढला पण झुकला नाही, अशी चर्चा साताऱ्यासह राज्यभर रंगू लागली आहे.