

सातारा : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे भूजल पातळीही खालावत चालली आहे. यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील 35 गावे व 186 वाड्यांमधील 39 हजार 343 नागरिक व 9 हजार 485 जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये 29 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे, विहीरी, तलाव, धरणातील पाणी पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, संभूखेड, कारखेल, मार्डी, पानवण, शिरवली, वारूगड, उकीर्डे, कोळेवाडी, महिमानगड, परकंदी, शिंदी बु. दोरगेवाडी ही 29 गावे व 166 वाड्यांना 17 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यातील गुंडेवाडी, मांढरदेव, बालेघर, आनंदपूर या 4 गावे व 5 वाड्यांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, भोसगाव, शिद्रुकवाडी, वरची शिद्रुकवाडी, कोळेकरवाडी अशा 6 वाड्यांना 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पाटण तालुक्यात 10 वाड्यांमध्ये 1212 नागरिक व 993 जनावरांना 6 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात 2 गावे 8 वाड्यांमधील 2772 नागरिकांना 2 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.