

सातारा : जिल्ह्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 43 गावे व 186 गावांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सुमारे 47 हजार 289 नागरिक व 10 हजार 203 जनावरांची तहान 34 टँकरच्या पाण्यावर आहे. मे महिन्यात आणखी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे भूजल पातळीही खूपच खालावली आहे. विहिरी, तलाव, नदी, नाले, ओढ्यांमधील पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, संभूखेड, कारखेल, मार्डी, पानवण, शिरवली, वारूगड, कुळकजाई, उकिर्डे, कोळेवाडी, महिमानगड, परकंदी, शिंदी बु., टाकेवाडी, सुरूपखानवाडी, दोरगेवाडी अशी मिळून 29 गावे व 166 वाड्यांमधील 31 हजार 47 नागरिक व 6 हजार 612 जनावरांना 17 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
वाई तालुक्यातील गुंडेवाडी, मांढरदेव, बालेघर, आनंदपूर या 4 गावे व 6 वाड्यांमधील 4 हजार 312 नागरिक व 1 हजार 880 जनावरांना 4 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, भोसगाव, शिद्रुकवाडी या 6 वाड्यांना 1 हजार 212 नागरिक व 993 जनावरांना 6 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
खटाव तालुक्यातील एनकूळ, जायगाव, कामर्थी, कातळगेवाडी, रणसिंगवाडी, गारवडी, मोळ, मांजरवाडी अशी 9 गावे व 8 वाड्यांमधील 10 हजार 212 नागरिक व 530 जनावरांना 6 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. खंडाळा तालुक्यातील गोळेगाव येथील 506 नागरिक व 188 जनावरांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.