

वडूज : खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात कोणीतरी विषारी पावडर टाकल्याने जलाशयातील हजारो मासे व इतर जलचर प्राणी अक्षरशः तडफडून मरत आहेत. या मृत जलचर प्राण्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या चार दिवसापूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी रात्री अपरात्री असा विघ्नसंतोषी प्रकार केला आहे. त्यांच्या या उपद्व्यापामुळे ऐन प्रजनन काळात दररोज शेकडो मुके प्राणी बळी पडत आहेत. या मृत जलचर प्राण्यांमुळे वडूज रोड, पाण्याची टाकी तसेच धरण रस्ता परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. तर याच तलाव्यातून वडूज शहरासह आजुबाजूच्या खेडेगावांना पाणी पुरवठा होत असतो. प्रशासनाने मृत माशांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर पाणी दूषित होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
याबाबत येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव, वेदावती मच्छीमार संस्थेचे संस्थापक एम. एस. गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील प्रकारास दुजोरा दिला आहे. तसेच पोलिस व नगरपंचायत प्रशासनास माहिती दिल्याचे सांगितले. तर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी कार्यबाहुल्याच्या व्यापामुळे फोन उचलण्याचे औदार्यही दाखवले नाही. दरम्यान, धरण परिसरात इतकी दुर्गंधी पसरली आहे. या परिसरातून ये-जा करताना नागरिकांना नाकाला हात लावून जावे लागत आहे.