सातारा : अवकाळीचे सावट कमी झाले असून जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने अवघे जनजीवन होरपळू लागले आहे. उकाडा व घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हात कष्टाची कामे करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका वाढत आहे. शनिवारी साताऱ्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरही आता तापू लागले असून तेेथील पारा 34 अंश नोंदला गेला आहे.
यावर्षी मुबलक पाऊस पडूनही जिल्ह्यासह राज्यात उन्हाळी हंगामाच्या प्रारंभीच उन्हाची तीव्रता वाढली आहे. मार्चअखेरीला जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने तामानात काही प्रमाणात घट झाली होती; मात्र मागील आठवड्यापासून अवकाळीचे सावट हटल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. शनिवारी सातारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावला असून महाबळेश्वरचे 34 अंशांपर्यंत नोंदविले.