

शेंद्रे : सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा परिसरात बोगदा शेंद्रे रोडलगत असलेल्या ‘गौरव डिस्पोजेबल कंपनी’च्या द्रोण पत्रावळी बनवणाऱ्या कारखान्याला . भीषण आग लागल्याची घटना घडली. हा कारखाना सागर रघुनाथ जाधव (रा. सातारा) यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा कारखाना बंद करून सर्व कामगार घरी गेले होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारखान्याच्या पाठीमागील भागात एस ई बी चा पोलवर शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि कारखान्यातील मोठ्या प्रमाणावरील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, कारखान्यात ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण जात होते.
या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि एकूण नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे.