

सातारा : सातारा-लोणंद मार्गावरील वेण्णा नदीवरील वाढे पुलावर उकळी खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करताना वाहनांसह नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून या पुलाची स्थिती कायम असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच खड्डे भरणे, पॅच वर्कसह रस्त्यांच्या कामांचा दर्जा सुधारण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सातारा, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव या तालुक्यांमधून सातारा शहरातील दळणवळणासाठी खुशकीचा मार्ग म्हणून सातारा लोणंद मार्गाचा वापर केला जातो. नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ राहते. तसेच पुणे-मुंबईसह परराज्यातील मालवाहतूकही याच मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या परिसरातील सातारा शहरात दळणवळण असलेल्या 36 गावांना नेहमीच गैरसोयीला सामोरे जावे लागते. पावसात या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे.
मागील काही वर्षांपासून वाढे पुलावर दोन्ही बाजूंकडून येणार्या पाण्यामुळे तळे साठते. हे पाणी काढून देण्यासाठी वारंवार मोर्या खुल्या केल्या जात असल्या तरी पाण्याबरोबर येणार्या मातीमुळे त्या पुन्हा बंद होतात. पावसाळ्यात या पुलावरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अगदी अर्ध्या-अर्ध्या फुटावर खोल-खोल खड्डे असल्याने जाळेच तयार झाले आहे. यातून मार्ग काढताना वाहनांसह नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहेत. या मार्गावरुन नियमित प्रवास करणार्या प्रवाशांपैकी अनेकजण मणकाविकाराने त्रस्त आहेत. वारंवार होणार्या वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाढेपुलावरील खड्डे संबंधित प्रशासनाने त्वरित मुजवावेत. यापूर्वीही या रस्त्याची मलमपट्टी करताना दर्जाहीन डांबरीकरण केले जात असल्याने वारंवार खड्डे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर खड्डे मुजवताना किंवा पॅचवर्क करताना कामाचा दर्जाही सुधारावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावरील रस्त्याची ही अवस्था असून त्याकडे कोणतीच यंत्रणा गांभीर्याने घेत नसल्याने स्थानिकांसह या मार्गावरील प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.