

सातारा : सातार्यातील यादोगोपाळ पेठेतील पोरे बोळ परिसरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी राजवाडा ते समर्थ मंदिर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आक्रमक महिलांनी वाहने रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली. यावेळी माहिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.
यादोगोपाळ पेठ परिसरातील काही घरांना अवेळी, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे या पेठेतील महिलांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले. संतप्त महिलांनी रस्त्यांवर हंडे मांडून रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनीही धाव घेतली. या परिसराचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी भेट घेतली. त्यांनी महिलांची समजूत काढल्यावर आंदोलन मागे घेतले. नगरसेवक व नागरिकांनी सुचवलेली कामे प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावीत अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे संदीप सावंत उपस्थित होते.