

सातारा : माझे वडील स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीत होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ते मिळाले नाही म्हणून त्यांनी कधी खंत मनात ठेवली नाही. राजकारणात पदे येतात आणि जातात त्यामुळे व्यक्तिगत नुकसान होतेच; पण अभयसिंहराजे मुख्यमंत्री न झाल्यामुळे सातारा जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘पुढारी महासमिट’मध्ये आपली खदखद उघड केली.
पश्चिम महाराष्ट्र म्हणता परंतु पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांची नावे घेता त्यात सातारा असूनही आजही साताऱ्याचे नाव घेतले जात नाही, असेही शिवेंद्रराजेंनी सुनावले. ‘पुढारी’ न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने शिवेंद्रराजे भोसले यांनी अनेक विषयांवर परखडत आणि स्पष्ट मते मांडली. सातारा जिल्ह्याचा स्वाभिमानी नाराही त्यांच्या मुलाखतीत उलगडला.
केवळ नामसाधर्म्यातील गोंधळामुळे अभयसिंहराजे भोसले यांचे मुख्यमंत्री पद गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मी छत्रपती घराण्याचा वारसदार आहे. आमच्यावर जे संस्कार आहेत त्याचवेळी मला माझ्या वडिलांनी दिलेला वारसा आशीर्वादासारखा आहे. त्यांची लिगसी मला पुढे चालवायला मिळाली. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहकार व अन्य बाबतीत त्यांनी दिलेले याेगदान उल्लेखनीय होते. अभयसिंहराजेंना संधी मिळाली नाही मात्र त्यावेळी काय घडले हे मला माहित नाही, मला कधी त्यांनी ते सांगितले नाही किंवा तशी त्यांनी तक्रारही केली नाही; पण ते मुख्यमंत्री झाले असते तर सातारा जिल्हा विकासात पुढे गेला असता.
तुम्ही पश्चिम महाराष्ट्र म्हणता त्यात बाकीचे जिल्हे मोजता मात्र सातारा जिल्ह्याचे नाव घेत नाही. सातारा जिल्ह्याचा अपेक्षित दबदबा तेव्हा दिसला नाही त्यामुळे कदाचित तसे घडत असावे. कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांचा विकास झाला आणि आम्ही मात्र त्या काळात मागे पडलो. आता साताऱ्याला पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.