

वाई : वाई पोलीस ठाणे हद्दीत रोहित्रांमधील (डीपी) तांब्याच्या तारेची चोरी करणाऱ्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुकेश माणिक जाधव (वय 45), अनिकेत सुभाष बनसोडे (वय 22), अर्जुन राजू जाधव (वय 20, सर्व रा. मलठण, फलटण), रोहन लाखन घाडगे (वय 24), विजय बाबुराव शिंदे (वय 36), मनोज नामदेव घाडगे (वय 40, सर्व रा. यशवंतनगर, वाई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अनिकेत आणि अर्जुन जाधव यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून धोम कॅनॉल परिसरात रोहित्रांचे नुकसान करून तांब्याच्या तारा चोरी करण्याचे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित होत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तपास पथकाची नियुक्ती केली. सीसीटीव्ही सुविधा नसतानाही पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांकडून 300 किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन व पाच मोबाईल फोन असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संशयितांकडून वाई पोलीस ठाण्यातील सात गुन्हे उघडकीस आले आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक, हवालदार अजित जाधव, पोलीस अंमलदार नितीन कदम, हेमंत शिंदे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड, विशाल शिंदे मारोती लोलापोड, पोलीस पाटील संदेश, वैराट, जनार्दन गोळे यांनी केली.