

कोडोली : विलासपूरमधील कारंजकरनगर मध्ये मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यासाठी रहदारीच्या रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, हा खड्डा न मुजवल्यामुळे अपघाताला निमंत्रण देत आहे. या खड्डयामुळे वाहतूक धोकादायक बनली असून स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळी येथे अपघात होऊन जीवित हानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कारंजकरनगर लगतच्या पाण्याच्या टाकीला जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात पाणी गळती लागली होती. त्यावेळी गळती काढण्यासाठी रहदारीच्या रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. या ठिकाणची पाणी गळती काढण्यात आली. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित ठेकेदाराने खड्डा मुजवला नाही. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे पादचारी व वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
या रस्त्यावरून शिवराज पंपाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून कारंजकरनगर, सहजीवन सोसायटी, कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. परंतु या रस्त्यावरच खोदलेला खड्डा वेळीच मुजवण्यात न आल्याने अपघात होत आहेत. शिवराज चौकाकडे जाणारा मधला मार्ग बंद झाल्याने पादचारी व वाहनचालकांना जवळपास दोन कि.मी.चा वळसा घालून जावे लागत आहे. तसेच अंधारात या ठिकाणी आपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने याची दखल घेवून खड्डा मुजवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.