

सातारा : मुलाचे ८ वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर त्याचा विरह सहन होत नसल्याने तणावाखाली असलेल्या आई-वडीलांनी विषारी औषध प्राशन करत जीवन संपविले. काळोशी ता.सातारा येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून सातारा तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. विनायक ज्ञानू गंगावणे (वय ४९) व सविता विनायक गंगावणे (वय ४६ दोघे रा.काळोशी) असे दुर्देवी दाम्पत्याचे नाव आहेत.
विनायक व सविता हे दाम्पत्य गरीब आहेत. बिगारी व घरकाम करणे हा त्यांचा व्यवसाय होता. त्यांना १२ वर्षाचा एकुलता एक मुलगा होता. साधारण ८ वर्षापूर्वी त्याला उलट्या, जुलाबाचा त्रास झाला. तब्येत ठीक होत नसल्याने त्याला त्यावेळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यानंतर या दाम्पत्याला नैराश्य आले. अशी माहिती समाेर येत आहे.
गंगावणे दाम्पत्य जास्त कोणाशी बोलत नव्हते. मुलाचा विरह त्यांच्या राहण्यातून, बाेलण्यातून जाणवत होता. दि. १३ जुलै रोजी पती-पत्नीने राहते घरी विषारी औषध प्राशन केले. ही बाब गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी दोघांना सिव्हीलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना दि. १४ जुलै रोजीच सकाळी व सायंकाळी पती-पत्नीचे निधन झाले.