

कोरेगाव : रहिमतपूर-सातारा राज्य महामार्गावरील धामणेर (ता. कोरेगाव) हद्दीत भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या शेतकऱ्याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकरी अशोक रघुनाथ थोरात (वय ५२) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे धामणेर गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धामणेर येथील अशोक थोरात हे रहिमतपूर रेल्वे स्टेशनजवळील समर्थ बेकरी परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या हिरो होंडा शाईन (क्र. एमएच-सीडी ३६४) दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक थोरात गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीस्वारही जखमी झाला. अपघातानंतर रहिमतपूर पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमी अशोक थोरात यांना उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागितले.
मृत अशोक थोरात यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले असे परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अभिजित शंकर थोरात यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीस्वार तुषार काकासो बुधावले (रा. अपशिंगे, ता. कोरेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन माने करत आहेत.