

सातारा : सातारा पालिकेची निवडणूक झाल्यामुळे नगराध्यक्षांसह नगरसेवकांची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाने वॉर्डपुरते मर्यादित काम न करता साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. साताऱ्याचा कायापालट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुढील 5 वर्षांत सातारा नगरपालिकेची महानगरपालिका करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा पदग्रहण समारंभ सातारा पालिकेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते. ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा पान 2 वर
पालिकेला चार वर्षानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळाले आहेत. सातारा शहराच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. वॉर्डची जबाबदारी नगरसेवकांवर आली आहे. साताऱ्यात पाहिल्यांदाच भाजपच्या विचारांची नगरपालिका निवडून आणू शकलो. राज्यात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून पसंती मिळाली आहे. जिल्ह्यात पक्षाकडे 10 पैकी 7 नगराध्यक्ष व पालिका आहेत.
भाजपच्या विजयाची घोडदौड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कायम ठेवायची आहे. त्यामुळे भाजपचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. प्रत्येकाचे ग्रामीण भागाशी संबंध आहेत. साताऱ्याच्या विकासासाठी भाजप उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन काम करावे. बऱ्याच अपक्षांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. पण निर्णय घेताना उमेदवारी देता आली नाही. मनात कोणतीही शंका ठेवू नका. पदाधिकाऱ्यांकडून विकासकामा-संदर्भात अपक्षांशी फारकत घेतली जाणार नाही. विकासाच्या बऱ्याच बाबी मार्गी लावल्या असून नागरिकांच्या अपेक्षा एकसंघ राहून पूर्ण करायच्या आहेत. भाजप म्हणून लोकांना मते मागितली असून पक्ष म्हणून सातारकरांची आपल्यावर असलेली अपेक्षा गतीने पूर्ण करायची आहे. प्रभाग व शहराचे नियोजन एकत्र येवून करावे लागणार आहे.
साताऱ्याचा झपाट्याने विकास झाला पाहिजे ही अपेक्षा साताकरांची आहे. सातारा पालिकेची निवडणूक झाली असली तरी पुढील पाच वर्षांनी ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी सातारा महापालिकेची निवडणूक झाली पाहिजे. सातारा नगरपालिका ही महानगरपालिकेत परावर्तीत करायची आहे. त्याप्रमाणे आपल्याला काम करायचे आहे. नागरिकांना भौतिक सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. आपल्याला विरोध करायला कुणीही सभागृहात नाही इतका विश्वास सातारकरांनी टाकल्याने काम करावे लागणार आहे. प्रभागापुरते मर्यादित काम न करता शहर म्हणून काम करायला हवे.
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कामे करावी लागतील. भाजपवर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के पार पाडू. केंद्र व राज्य सरकारकडून सातारकरांना झुकते माप मिळेल. पार्किंग, वाहतूक कोंडी उपाययोजना, ऑडोटोरियम, मंडई यासाठीचे प्रस्ताव झेडपी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 25 फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाने तयार करावेत. त्यासाठी तरतूद राज्याच्या अंदाजपत्रकात केली जाणार आहे. पाच वर्षांत साताऱ्याचा कायापालट करून शहर आणखी सुंदर करण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहेत.