

सातारा : येणार... येणार म्हणत जूनचा तिसरा आठवडा उजाडला, तरी मान्सूनच्या पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला होता. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी राज्याच्या पश्चिम भागात मान्सूनचे आगमन झाले. या पावसाने शेतकरी सुखावून गेला आहे. मंगळवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत सातार्यात १७.१ मिमी, तर महाबळेश्वरमध्ये ५३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने सातारा जिल्ह्यासाठी २४ ते २७ रोजी यलो अलर्ट दिला आहे.
अल निनो व हवामान बदलामुळे मान्सून सक्रिय झाल्यानंतरही पावसाची प्रतीक्षा कायम होती. मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत होते. पाणी टंचाईमुळे टँकरची मागणी वाढत होती. खरिपाची पेरणी रखडल्याने शेती व्यवसायाची चिंता वाढली होती. जून अखेर आल्याने बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. मात्र, मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात भाताच्या तरव्यांसाठी तसेच धूळवाफेवरील पेरण्यांसाठी हा पाऊस जीवदान ठरला.