

शिखर शिंगणापूर : मार्डी (ता. माण) येथील बेंदमळा परिसरातील शेतात चरत असलेल्या शेळीला विजेच्या तारेचा शॉक लागल्याने शेळीला वाचवण्याच्या नादात आजी व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. मालन विलास काळे (वय ६०) व सुमीत युवराज काळे (१३) अशी मृत झालेल्या आजी-नातवाची नावे आहे. या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिवडी रस्त्यालगत असलेल्या बेंदमळा शेतामध्ये मालन काळे या नातू सुमित याच्यासह शेळ्या, मेंढ्या चारत होत्या. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास शेळ्या चरत असताना शेतात पडलेल्या विजेच्या तारेमध्ये शेळीचा पाय अडकल्याने शेळी तडफडू लागली. यावेळी शेळीला वाचवण्यासाठी सुमीत गेला. यावेळी सुमीतलाही शॉक लागल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याची आजी मालन याही गेल्या असता त्यांनाही शॉक लागला. त्यामुळे विजेचा शॉक लागल्याने शेळीसह आजी -नातवाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मार्डीचे पोलिसपाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी शिंगणापूर पोलिसांना दिली.
महिनाभरापासून पडली होती आर्थिंगची वायर
दहिवडी-मार्डी रस्त्यावरील बेंदमळा परिसरात महिनाभरापासून विजेची आर्थिंग तार पडल्याची माहिती ग्रामस्थांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र, याकडे वीजकंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी डोळेझाक केल्याने वीजमंडळाच्या गलथान कारभारामुळे दोन बळी गेले असून, वीजवितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.