

तासवडे टोलनाका : वहागाव ता. कराड येथे कृष्णा नदीला दुर्गंधीयुक्त केमिकलचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे नदीतील हजारो मासे व इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. तसेच परिसरातील नागरिकांच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीला दुर्गंधीयुक्त केमिकलचे पाणी सोडणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी वहागाव, घोणशी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
उंब्रज,वराडे,तासवडे,बेलवडे हवेली,वहागाव,घोणशी आणि पुढे कराड परिसरातून कृष्णा नदी वाहत आहे. कृष्णा नदीच्या काठावरच या परिसरातील प्रत्येक गावाची पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल उभारण्यात आले आहेत. नदीची पाणी जॅकवेलमध्ये आल्यानंतर विद्युत पंपाने ते गाव स्तरावरील पाणी पुरवठा योजनांना दिले जाते.
दरम्यान मंगळवारी सकाळी वहागाव येथील दीपक पवार, सयाजी पवार यांना नदीला दुर्गंधीयुक्त केमिकलचे पाणी दिसले. पाण्यावर हजारो लहान मासे मृत पावल्यामुळे तरगंत होते. नदीच्या कडेलाही अनेक मोठे मासे आणि जलचर प्राणी मृत झाले होते. दुर्गंधीयक्त केमिकलच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच कृष्णा नदी पुढे कराड शहरापासून जाते. कराड शहराचेही पिण्याचे पाण्याचे जॅकवेल कृष्णा नदी कठावरच आहे. त्यामुळे या परिसरासह कराड शहरातही साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.