

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर ओसरला असून धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी झाल्याने रविवारी संध्याकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवरून पाच फूट करण्यात आले आहेत. सध्या धरण ८६.८६ टक्के भरले असून धरणात ९१.४२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरण भरण्यास केवळ १३.८३ टीएमसी पाण्याची गरज आणि सध्या सरासरी ३८,३८७ क्युसेक आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सहा वक्री दरवाजे पाच फुटांवर करण्यात आले आहेत. त्यातून २९,१७३ व धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १०५० असे एकूण ३०,२२३ क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ असल्याने नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा देण्यात आलेला इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
धरणात सध्या उपलब्ध ९१.४२ टीएमसी तर उपयुक्त ८६.३० टीएमसी पाणीसाठा आहे. शनिवारी संध्याकाळी पाच ते रविवारी संध्याकाळी पाच या २४ तासात व १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस कोयना ६७ (३१५५) मि.मी., नवजा ६० (३८०१) मि.मी., महाबळेश्वर ९२ (३९५३) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ १३.८३ टीएमसी पाण्याची गरज आहे.
अलमट्टीतील विसर्गात वाढ
बेळगाव : अलमट्टी जलाशयातून १ लाख ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे पाणीसाठ्यात चढ-उतार सुरू आहे. आवकेपेक्षा विसर्ग जास्त असल्याने जलाशयाची पातळी थोडी कमी झाली आहे. सध्या पाणीपातळी ५१८.९५ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ११२.१३२ टीएमसी ९१.१० टक्के आहे. कमाल साठवण क्षमता १२३.०८१ टीएमसी इतकी असून आज दहा तासांतील सरासरी आवक १,२१,५०० क्युसेक इतकी होती, तर सरासरी जावक १,२६,००० क्युसेक इतकी होती. सध्या जलाशयातून नदीत १,३०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.