

मसूर : कालगाव (ता. कराड) येथील शिवारात बुधवारी रात्री चोरट्यांनी केबल वायरवर डल्ला मारला. गावच्या उत्तरेला ‘खडक’ शिवारात कृष्णा नदीपात्रातून पाणी उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या 14 शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना रात्री 9 ते 12 या वेळेत घडली असून भारनियमनाचा फायदा घेत चोरी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कवठे-भुयाचीवाडी दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वाहून गेल्याने नदीतील पाणी आत गेल्यामुळे शेतकऱ्यांनी 200 ते 260 फूट लांबीच्या केबल टाकून कृषीपंप जोडले होते. चोरट्यांनी संधी साधत सर्व केबल एकत्र करून त्यावरील कोटिंग जाळून आतील तांब्याच्या तारा लंपास केल्या. या घटनेत दत्तात्रय माळी, संजय चव्हाण, राजेंद्र तावरे, अमरेश चव्हाण, रामचंद्र चव्हाण, युसुफ मुल्ला, अरविंद कुलकर्णी, अमोल चव्हाण यांसह एकूण 14 शेतकऱ्यांच्या सुमारे 2800 ते 3000 फूट केबल चोरीस गेल्या आहेत.
एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात पिकांना पाणी देणे अत्यावश्यक असताना ही घटना घडल्याने पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत मसूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. आरोपी सापडले नाहीत तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.