

सातारा : सोलापूर येथे इम्तियाज जलील यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गट साताराकडून निदर्शने करण्यात आली. दरम्यान, जलील यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळ्याचे दहन करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी सोलापूर येथे गरळ ओकली. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मी मानत असून त्यांनी कधीच जातीय आधारावर राजकारण केले नाही. परंतु त्यांचे वडिल बाळासाहेब ठाकरे यांनी जातीच्या आधारावर राजकारण केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा जातीच्या आधारावरचं राजकारण बाळासाहेबांनी सुरू केले, असे वक्तव्य केले होते. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असे आरोप करणे अत्यंत निंदनीय आहे. जनतेच्या मनात रोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. इम्तियाज जलील सारख्या माणसांचे असे विधान महाराष्ट्रातील हिंदूंच्या आणि मराठी माणसांच्या भावना दुखावणारे आहे.
बाळासाहेबांनी या हिंदुस्थानात सर्व धर्मातील लोकांनाही न्याय दिला आहे. कित्येक जातीच्या लोकांना मोठं केले. अशा महान व्यक्तीवर बोलणार्या जलील याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख रणजित भोसले, उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, जिल्हा समन्वयक प्रदीप माने, वाई विधानसभा प्रमुख विकास शिंदे, शहरप्रमुख निलेश मोरे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, राजू केंजळे, रोहित कटके, रवींद्र भिलारे, संजय सुर्वे, शहर संघटक अमोल इंगवले, किरण कांबळे, अमोल खुडे, पवित चोरगे उपस्थित होते.