

सातारा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील 22 गावांची तपासणी सुरू असून त्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेची जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती दाखल झाली आहे. शासनाच्या निकषानुसार प्रमुख आठ मुद्यांनुसार ही समिती गावाची पाहणी करून गुणांकन करणार आहे.
धाराशिवच्या समितीने जिल्ह्यात संबंधित गावांच्या तपासणीला सुरुवात केली आहे. ही समिती सुशासन मुक्त पंचायत, सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ, विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करत आहे.
तालुकास्तरावरील प्रथम 2 ग्रामपंचायतींचे जिल्हास्तरीय समितीमार्फत मुल्यमापन करून, सर्वाधिक गुण प्राप्त 3 ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय अतीउत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवडले जाणार आहे. त्यातील प्रथम 2 ग्रामपंचायतींचे विभागस्तरीय समितीमार्फत मुल्यमापन करून 3 ग्रामपंचायतींची निवड होणार आहे. त्यापैकी प्रथम 2 ग्रामपंचायतींचे राज्यस्तरीय समितीमार्फत मुल्यमापन करून 3 ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर निवड केली जाणार आहे.
जिल्ह्यात फलटण तालुक्यातील राजाळे, काळज, माण तालुक्यात आंधळी, थदाळे, खटावमध्ये सातेवाडी, गारवडी, महाबळेश्वर तालुक्यात मेदगुताड, रामेश्वर, वाई तालुका परखंदी, कळंबे, खंडाळा तालुका विंग, हरिपूर, जावली तालुका कावडी, म्हाते खुर्द, सातारा तालुका फत्त्यापूर, कामेरी, पाटण तालुका मान्याचीवाडी, सुतारवाडी, कराड तालुका सावरघर, खुर्दवाडी, कोरेगाव तालुका धामणेर, आंबोडे संमत वाघोली समावेश आहे. समितीचे जिल्ह्यात आगमन झाले असून समितीने निवडक गावांची तपासणी सुरु केली आहे.