

सातारा : सातारा शहराचे वैभव असलेल्या गांधी मैदानावरील राजवाड्यासमोर नो पार्किंगचे फलक ठिकठिकाणी लावले असतानाही काही वाहनचालक बेजबाबदारपणे वाहने उभी करत असल्याने शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. पोलिस व नगरपालिका प्रशासनाने अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गांधी मैदानावरील राजवाडा हे साताऱ्याचे वैभव आहे. ऐतिहासिक कलाकुसर असल्याने येणारे शिवप्रेमी आपल्या मोबाईलच्या छबीमध्ये राजवाड्याचे फोटो टिपत आहेत. नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी नो पार्किंग फलक उभारले आहेत. मात्र काही वाहनचालकांनी या फलकाला केराची टोपली दाखवली आहे. याठिकाणी नगरपालिका प्रशासनाकडून लाखो रूपये खर्च करून ऐतिहासिक असा पदपथ तयार करण्यात आला आहे. मात्र त्या पदपथावरच दुचाकी वाहनचालक आपली वाहने पार्किंग करत आहेत. त्यामुळे हा पदपथ नागरिकांना चालण्यासाठी आहे की वाहने पार्कींग करण्यासाठी? असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तसेच राजवाड्याच्या चौपाटीवरील विक्रेत्यांनी राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मालवाहू रिक्षा लावली आहे. त्यामुळे शिवप्रेमी व नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी पदपथावर उभ्या केलेल्या बेशिस्त वाहनांवर कारवाई करावी. राजवाड्याचा ऐतिहासिक ठेवा हा प्रत्येकांनी जपला पाहिजे. मात्र त्याचे पालन वाहनचालकांकडून केले जात नाही. कारवाईचा बडगा उगारल्यानंतरच वाहनधारकांना शिस्त लागणार आहे.