

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर रविवारी अज्ञात व्यक्तीने वणवा लावला. या आगीमुळे धुराचे लोट परिसरात पसरले होते. या वणव्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाली असून, आठ दिवसांत तिसऱ्यांदा वणवा लागला आहे.
अजिंक्यतारा किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष व गवत आहे. उन्हाळाच्या तीव्रतेने ते सुकले आहेत. त्यातच उन्हाळ्यात होळीनंतर वणवा लावण्याच्या घटनांना ऊत येतो. किल्ल्याच्या दक्षिण दिशेने अज्ञात समाजकंटकांकडून रविवारी सकाळी वणवा लावण्यात आला. हे वणवे लावण्याचे प्रकार मागील आठवड्यात तीन वेळा घडले आहेत. यामुळे शेकडो वृक्षवेली तसेच अनेक प्रकारचे कीटक पक्षी प्राणी यांना ईजा पोहोचत आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीपासून ते माथ्यापर्यंत मोठे धुराचे लोट पहायला मिळत होते. शहराच्या दिशेने खालच्या बाजूलाही आग पसरली. किल्ल्यावर असलेले मोठे वृक्ष, वन्यजीव यांना या वणव्याची झळ बसली. पाखरांची घरटी जळाली. सरपटणाऱ्या प्राण्यांनाही आहुती मिळाली. अनेक हिरवेगार वृक्ष कोळशात रुपांतरित झाले.