सातारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्ह्याने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्रातही अव्वल स्थानावर असल्याची माहिती डॉ. प्रिया शिंदे यांनी दिली. तसेच या यशाबद्दल त्यांच्यासह उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण व अर्थ सभापती तेजीस्विनी कदम, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, महिला बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, कृषी सभापती लता कर्णे यांनी जिल्हावासियांचे अभिनंदन केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीने 1000 गुणांची तपासणी करुन जिल्ह्याचे मूल्यांकन केले होते. यामध्ये गावांमधील ओला व सुका कचरा वर्गीकरण, घरगुती कचरा संकलन व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, शौचालयांचा वापर व देखभाल, स्वच्छता विषयक जनजागृती, लोकसहभाग, शाळा व अंगणवाडी स्वच्छता तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश होता.
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये प्रभावी कचरा संकलन व्यवस्था, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व सुका कचरा पुनर्चक्रणासाठी पाठवण्याची व्यवस्था तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी विविध गावांमध्ये शोषखड्डे, रूट झोन, टीबीएफ, डीवॅट, ग्रेवॉटर व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये स्वच्छता जनजागृतीसाठी ग्रामसभा, रॅली, शाळा अभियान, स्वच्छता शपथ, भित्तीचित्रे व लोकसहभागातून विविध उपक्रम राबवण्यात आले.
या यशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता प्रज्ञा माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहुल देसाई, कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान आहे.