

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी धरणातील पाणी पातळी ९५ टक्क्यावर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी काही धरणातून विसर्ग सुरू आहे. नद्याच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ आहे. जिल्ह्यात पावसाने मात्र उघडीप दिली आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४.२०० टीएमसी असून धरणात ९४.०८ टक्के पाणी आहे. धरणात ६ हजार १७२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धोम धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ११.५२० टीएमसी असून धरणात ९८.५५ टक्के पाणी आहे. धरणात ८३० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणातून १ हजार ९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धोम बलकवडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ३.९१० टीएमसी असून धरणात ९५.७१ टक्के पाणी आहे. धरणात ४५७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कण्हेर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ९.२०० टीएमसी असून धरणात ९५.९३ टक्के पाणी आहे. धरणात ६४० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणातून ६४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उरमोडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ९.३४० टीएमसी असून धरणात ९६.७९ टक्के पाणी आहे.
धरणात ५७७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणातून ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तारळी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ५.६३० टीएमसी असून धरणात ९६.४० टक्के पाणी आहे. धरणात १ हजार २२६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणातून १ हजार ४७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी धरणात २८.६२ टक्के, नेर ७२.१२ टक्के, राणंद ३.९८ टक्के, आंधळी ५१.१५ टक्के, नागेवाडी १०० टक्के, मोरणा ८८.९२ टक्के, उत्तरमांड ६९.१९ टक्के, महू ८०.९ टक्के, हातगेघर ४६ टक्के, वांग मराठवाडी ७३.१६ टक्के पाणीसाठा आहे.