

सातारा : सातारा शहर परिसरात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सात जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी हा आदेश दिला.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख ऋषिकेश ऊर्फ दादा शशिकांत पवार (वय २२, रा. काळोशी, कोडोली) याच्यासह जितेंद्र दीपक सुर्वे (२२), पृथ्वीराज भीमराव साळुंखे, संदीप दादा वलेकर (२२), अनिकेत दादा वलेकर (२२), प्रेम ऊर्फ बबलू विलास पार्टे (२४, रा. मेढा) आणि सिद्धार्थ विवेक महाडिक (१८) यांचा समावेश आहे. या टोळीविरुद्ध दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, दुखापत करून शिवीगाळ व दमदाटी, अनधिकृत प्रवेश, हत्यारानिशी बेकायदेशीर जमाव करून दहशत निर्माण करणे तसेच बेकायदेशीर दारू विक्री यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
वेळोवेळी अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांनी केली. सुनावणीनंतर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी टोळीला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला.
या कारवाईसाठी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके व पथकाने तसेच सातारा शहर पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सरकार पक्षाच्या वतीने योग्य पुरावे सादर केले.