सातारा : सातारा शहर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दणका देत 10 जणांच्या टोळीला तडीपार केले. या कारवाईमुळे गुन्हेगार हादरले आहेत.
देवेंद्र ऊर्फ गोट्या ढोणे (31, रा. मंगळवार पेठ), प्रतीक सुरेश कोळी (25, रा. ढोणे कॉलनी), पराग गणेश निवळे (23, रा. मंगळवार पेठ), गणेश ऊर्फ गोट्या दत्तात्रय कणसे (25, रा. अंगापूर ता. सातारा), संकेत मधुकर आठवले (23, रा. गोडोली), आदित्य दीपक पोळ (25, रा. सैदापूर ता.सातारा), यश राजेंद्र येवले (19, रा. मंगळवार पेठ), चैतन्य ज्ञानेश्वर उईके (20, रा. रामाचा गोट, मंगळवार पेठ), यश संजय बिडकर (25, रा. मंगळवार पेठ), प्रकाश ऊर्फ दादा आनंदराव खरात (25, रा. रामाचा गोट, सर्व सातारा) अशी तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देणे यांसारखे दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
मात्र तरीही टोळीमधील संशयित गुन्हे करत होते. टोळीवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सातारा तालुका परिसरातील लोकांना या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर कायद्याचा वचक राहावा यासाठी सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. पोनि सचिन म्हेत्रे यांनी या टोळीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवला. तेथे सुनावणी होऊन पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी जिल्ह्यातून पाच महिन्यांसाठी सर्वांना तडीपार केले.