

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी तेजस्विनी संग्राम घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
स्वाभिमानी महिला सखी मंचच्या कार्याध्यक्षा म्हणून तेजस्विनी घोरपडे यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तेजस्विनी घोरपडे या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोजदादा घोरपडे यांच्या भावजय व युवा उद्योजक संग्राम घोरपडे यांच्या पत्नी आहेत.
स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये जवळपास 25 हजार महिलांचे संघटन त्यांनी तयार केले आहे. त्या उच्चशिक्षित असल्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला संधी मिळाल्याची भावना जिल्ह्यातून व्यक्त होत आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे तेजस्विनी घोरपडे यांनी संघटन केले आहे. त्याचपद्धतीने भाजपचे महिला संघटन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करता येईल, यासाठीच तेजस्विनी घोरपडे यांना जिल्हाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.
या निवडीसाठी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा आग्रह होता. या निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे यांनी अभिनंदन केले.