

सातारा : ईद, रक्षाबंधन तसेच शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्या संपल्यामुळे गावी आलेल्या नोकरदार, विद्यार्थी आणि चाकरमान्यांनी रविवारी पुणे-मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केल्याने महामार्गावर दिवसभर वाहनांची गर्दी झाली. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. आनेवाडी टोलनाक्यावर तर वाहनांच्या रांगांनी मोठे स्वरूप धारण केले होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागले.
जिल्ह्यासह परिसरातील अनेक नागरिक कुटुंबीयांसह गावी आले होते. सुट्ट्या संपत असल्याने सकाळपासूनच पुणे, मुंबई तसेच अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला. परिणामी, सातारा-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत वाढली.
वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान
सलग सुट्ट्यांनंतर मोठ्या प्रमाणावर वाहने परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन पोलिस आणि महामार्ग यंत्रणेसाठी आव्हान ठरले. महत्त्वाचे चौक आणि टोलनाक्यांच्या परिसरात वाहतुकीवर लक्ष ठेवून कोंडी होऊ न देणे आवश्यक बनले होते. अचानक वाहनांचा ओघ वाढल्यास कोंडीची शक्यता आहे.