

सातारा : विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत जवळपास निश्चित मानली जात असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाने भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवला आहे. त्यामुळे संख्याबळ जास्त असतानाही भाजपला सावध पावले टाकावी लागत आहेत. ही जागा महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार पक्षाला सोडली असली तरी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अजूनही एकमत झाल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे युती - आघाडी सरळ लढत होणार की बहुरंगी लढत रंगणार याबाबत उत्सुकता आहे.
महायुतीतर्फे भाजपच या जागेसाठी प्रमुख दावेदार आहे. त्यामुळे साताऱ्यातून भाजपतर्फे सुनील काटकर, धैर्यशील कदम, शेखर गोरे तर सांगलीतून पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटातील काहीजणांनी या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीअंतर्गत ही जागा नेमकी कोणाला जाणार याबाबत सस्पेन्स आहे.
भाजपचे संख्याबळ जास्त असले तरी या निवडणुकीला जिल्हा परिषदेवेळी झालेल्या राड्याची किनार असल्याने भाजपकडूनही उमेदवारी जाहीर करण्याची गडबड केली जात नाही. त्यातच सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांनी उमेदवारी दाखल करून युतीमधील ट्विस्ट वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांची तर सांगलीतून प्रतीक जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे.