

सातारा: साधारणपणे दि. ७ जूनपासून पावसाळा सुरु होत असून मृगाच्या पावसानंतर पेरणीदेखील केली जाते. मृग नक्षत्र सुरु झाले असून पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात आल्या आहेत. खते बि-बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानांमध्ये शेतकरी वर्ग गर्दी करत आहे. हंगामपूर्व तयारी पूर्णत्वास आल्याने पेरणीसाठी बळीराजाला मृगाच्या पावसाची आस लागली आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून ढगाळ हवामान, शीत लहरी यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच जिल्ह्यांत काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. काही ठिकाणी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशात मृग नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. पहिल्या मृगाच्या पावसाने जमीनीची तहान कमी होते. माती बी रुजण्यास तयार होते. त्यामुळेच मृगाचा पाऊस पडून गेल्यावर पेरणीला प्रारंभ होतो. मात्र, जिल्ह्यातील काही भागात वळीवानेदेखील हुलकावणी दिली आहे. त्यामुळे त्या भागात मशागतीची कामेही खोळंबली आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वार्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मात्र, हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याने कुठे ढगफुटी सदृश्य तर कुठे केवळ वातावरण निर्मिती होत आहे. जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे बळीराजाला मृगाच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. खरीप हंगामासाठी नांगरणी, वखरणी, फणपाळी यांसारखी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. अल-निनोच्या पार्श्वभूमीवर हवामान खाते व कृषी विभागाने शेतकर्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा किंवा पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय घाईघाईने पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा इशरा दिला आहे. त्यामुळे सध्याचा हवामानाचा अंदाज व मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.