

वाई : तब्बल 45 वर्षांनंतर वाई विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंद पाटील यांच्या दौर्याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला आहे. बुधवार, दि. 25 रोजी मदत व पुनर्वसनमंत्री ना. मकरंद पाटील हे सातारा दौर्यावर येणार आहे. त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागतसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर किसनवीर आबा आणि यशवंतराव चव्हाण यांना मकरंदआबा अभिवादन करणार आहेत.
आ. मकरंद पाटील यांनी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील अधिवेशनाचे कामकाज पूर्ण करुन ते मुंबईला जाणार आहेत. त्यानंतर बुधवारी सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापासून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता शिंदेवाडी येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते शिरवळ, खंडाळा, वेळे येथून कवठे येथे स्वागत स्वीकारत येणार आहे. कवठे येथे किसनवीर आबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ते अभिवादन करणार आहेत.
कवठे येथून भुईंज, पाचवड, उडतारे, विरमाडे (आनेवाडी टोलनाका), लिंब फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, उंब्रज आणि तेथून कराड येथील प्रिती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर अभिवादन करणार आहेत.
सर्वसामान्य माणसांसाठी कायम दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात. त्यांच्याच वारसाला राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने जिल्हावासीयांच्या मनात वेगळाच आनंद आहे. सर्वसामान्य जनतेला आता थेट मंत्र्याला भेटून आपली कामे सांगता येतील आणि ती करूनही घेता घेतील. याची खात्री असल्याने सर्वसामान्य जनतेने आबांचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्याचा निर्णय घेतला आहे.