

सातारा : राज्यातील थकीत पीक कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवार (दि. २ जून) रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात जून महिन्यापासून या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार शासनाने आता प्रत्यक्ष निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील १ लाख ११ हजार २०३ शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेऊन थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश असणार आहे. सातारा जिल्ह्यात एकूण १ लाख ११ हजार २०३ शेतकरी पीक कर्जाच्या नूतनीकरणापासून वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांकडे एकूण १००२.७४ कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे थकीत कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमुळे या शेतकऱ्यांची थकबाकी कमी होऊन त्यांना पुन्हा कर्जपात्रता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बियाणे, खते, औषधे आणि इतर शेती खर्चासाठी नव्याने कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.