सातारा : शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे प्रत्यक्षात भाजपच चालवत असल्याची टीका त्यांनी केली. या दोन्ही पक्षांचा मालक हा भाजपच आहे. पैशांचा बेसुमार वापर आणि दबाव, धमकी देऊन जिल्हा परिषद सदस्य फोडण्याच्या प्रकारानंतर भविष्यात राज्यात आमदारांबाबतही अशीच परिस्थिती निर्माण होईल, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली.
आ. रोहित पवार म्हणाले, आज जिल्हा परिषद सदस्य फोडले जात आहेत, उद्या आमदारांबाबतही हेच होणार आहे. 2029 मध्ये दोन्ही पक्ष मिळून 40 पेक्षा जास्त आमदार भाजप फोडेल आणि त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाने वेगळ्या स्वप्नात राहू नये. भाजपच्या दावणीला बांधून घेतल्यामुळे या पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात आले आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते वेळोवेळी शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून ‘झालं गेलं विसरून जा’ असे सांगतात. त्यामुळे भाजपच या दोन्ही पक्षांचा खरा मालक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
आ. पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील वरच्या पातळीवरील मतभेद लवकरच मिटतील आणि पक्ष अधिक सक्षमपणे काम करेल. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. स्त्री शक्ती कायद्याची मागणी केली होती, मात्र काही प्रवक्त्यांचा अभ्यास कमी असून त्यांना व्यक्तीपूजन अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे सरकारच्या चुका झाकण्याचा प्रयत्न केला जातो, असा टोला त्यांनी आ. चित्रा वाघ यांना लगावला.