

सातारा : राज्य सरकारने आमने बंगला हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. आमने यांच्या मालकीच्या या बंगल्याच्या बदल्यात बाजारभावानुसार नुकसानभरपाईची रक्कम दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे आमने यांनीही कोर्टकचेरी न करता सकारात्मकता दाखवावी. प्रशासनाने मार्ग काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, नगराध्यक्ष अमोल मोहिते, सातारा प्रांताधिकारी आशिष बारकूल, आमने दाम्पत्य, एडीटीपीचे दत्तात्रय काळे, भूसंपादन अधिकारी प्रवीण साळुंके, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी विनोद जळक, चंद्रकांत खंडाईत प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ना. भोसले म्हणाले, आमने यांचे ते राहते घर असून, त्यांना तेथे काम करतानाही अडचणी येत आहेत. त्यांच्या मते बाजारभावाप्रमाणे त्यांना मोबदला मिळावा. त्यानुसार प्रयत्न करू. डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य आमने बंगल्यात होते. त्यामुळे सहकार्य करू. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, आमने बंगल्यात डॉ. आंबेडकर यांच्या आई-वडिलांचे वास्तव्य होते. त्यामुळे या बंगल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याचे नोटिफिकेशन निघाले आहे. आमने म्हणाले, माझ्याकडे वैयक्तिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. बाजारभावाप्रमाणे भरपाई दिली तर कोर्टातील प्रकरणे मागे घेतो.