

सातारा : कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीला पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दणका दिला. तिघांच्या टोळीला सातारा व सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
रितेश सर्जेराव घारे (वय 22, रा. घारेवाडी ता. कराड), शिवराज महादेव कुंभार (वय 29, रा. शुक्रवार पेठ, कराड), संग्राम अशोक पवार (वय 23, रा. आगाशिवनगर, मलकापूर ता. कराड) अशी तडीपार केलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. यातील रितेश घारे हा टोळीप्रमुख आहे.
सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या संशयित टोळीवर दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा मारामारी करून दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे कराड तालुका व कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी त्यांना वेळोवेळी अटक केली. तसेच प्रतिबंधक कारवाई केली. मात्र, संशयितांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट गुन्हेगारी कारवाई सुरुच ठेवल्या. या टोळीवर कायद्याचा धाक न राहिल्यामुळे कराड तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. यामुळे या टोळीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत होती.
कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोनि महेंद्र जगताप यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा व सांगली जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडे पाठवला. या प्रस्तावाची चौकशी डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी केली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी या टोळीला संपूर्ण सातारा व सांगली जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरता हद्दपार केले.
सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता आगामी काळात सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना हद्दपारी, मोका, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाई करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.