

पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लोणंद बाजूकडून गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटार बांधकाम करण्यात येत असले तरी या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या आठ-दहा दिवसांतच गटारांवर टाकलेले स्लॅब तुटून पडत असल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. यामुळे गुरुवारी ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले.
अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामात गटार बांधकामासाठी रेडी मिक्स काँक्रीटचा वापर केला जात आहे. मात्र, या काँक्रीटच्या दर्जाची योग्य तपासणी होत आहे की नाही, याबाबत संशय निर्माण झाला आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या कामामुळेही गुणवत्ता नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गटारांवरील स्लॅब अगदी कमी वजनानेही मोडून पडत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. रुंदीकरणासाठी डांबरी रस्ता खोदून त्यावर खडी-मुरमाचे थर टाकण्यात येत आहेत. मात्र, कामाचा दर्जा खराब असल्याने पिंपोडे खुर्दचे ग्रामस्थ आक्रमक झाले अन् हे काम बंद पाडले.
सातारा-लोणंद हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला पर्याय म्हणून अवजड वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्यामुळे रस्ता वारंवार खराब होत असून या मार्गावर लहान-मोठे अपघातांची मालिका सुरू आहे. अनेकांना या अपघातांत प्राण गमवावे लागले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही त्यावर कोणत्याच उपाययोजना झाल्या नाही. गटारांच्या बाजूला टाकण्यात आलेला मुरमाचा भराव योग्यरीत्या दाबला न गेल्याने अनेक वेळा अवजड वाहने अडकून बसत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.