

फलटण : राजुरी (ता. फलटण) येथे घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात विद्युत वायर जोडत असताना विजेचा धक्का लागल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजुरी गावात हळहळ व्यक्त होत आहे. सतीश बापुराव निकम (वय ३४, रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) असे धक्का लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश निकम हे बुधवारी सकाळी घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात विद्युत वायर जोडण्याचे काम करत होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच सकाळी सुमारे ९ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलीस चांगल अधिक तपास करत आहेत.