

लोणंद : फलटण तालुक्यातील काळज गावच्या हद्दीत फलटण - लोणंद मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातांत शेतकरी दाम्पत्यासह एक पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जुना डोंबाळवाडी फाटा येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील शेतकरी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर शनिवारी सायं. रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
बाळू तुकाराम गाढवे (वय 55) व पुष्पा बाळू गाढवे (वय 50, रा. काळज, ता. फलटण) हे दोघे दुचाकी (क्र. एमएच 11 सीएम 7268) वरून त्यांच्या शेताकडे जात होते. रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ते जुना डोंबाळवाडी फाटा येथे वळत असताना भरधाव कारने (क्र. एमएच 11 डीयू 9128) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कारचालक संभाजी जिनदास झिमल (रा. गंगोती, ता. माण) याने निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवून अपघात केल्याचा आरोप आहे. याबाबत ॲड. मल्हारी गाढवे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शनिवारी सायंकाळी आप्पा तात्या येळे (वय 62, रा. डोंबाळवाडी, ता. फलटण) हे सायं. 7.30 वाजण्याच्या सुमारास काळज येथील श्रीनाथ ॲकॅडमीसमोर लोणंद-फलटण मार्गावर रस्ता ओलांडत होते.
याचदरम्यान, लोणंदकडून फलटणकडे जाणाऱ्या कारने (क्र. एमएच-12 एसई 7986) या त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाहन चालक ज्ञानेश्वर शशिकांत ठोंबरे (रा. ठोंबरेवाडी (निढळ, ता. खटाव) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याची फिर्याद नाना बबन येळे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दिली आहे.